लुटारूंच्या सहकाराला सळो की पळो करून सोडणार ; कायद्याच्या पुनर्रचनेत अशोकराव स्वामींची ‘एन्ट्री’!

महाराष्ट्र म्हणजे सहकाराची पंढरी, पण आज याच पंढरीत विठ्ठलाभोवती बडव्यांचा गराडा पडला की काय, अशी भीती वाटू लागली आहे. सहकाराच्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या ‘बड्या’ सुभेदारांना आता चाप बसणार आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० या ‘जुनाट’ सांगाड्याला आता आधुनिकतेचे नवे कातडे चढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या महाकाय कामासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांची नियुक्ती करून सरकारने एका अनुभवी आणि झुंजार नेतृत्वावर विश्वास टाकला आहे.
सहकारातील ‘पांढऱ्या हत्तींना’ वेढा..!
गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात पारदर्शकतेचा दुष्काळ पडला होता. निवडणूक प्रक्रिया म्हणजे निव्वळ ‘घराण्याची’ जत्रा झाली होती. पण आता हा मांडव मोडला जाणार आहे. अशोकराव स्वामी यांची या समितीत झालेली वर्णी म्हणजे नुसती औपचारिकता नाही; हा वस्त्रोद्योगातील घामाचा आणि श्रमाचा सन्मान आहे. इचलकरंजीपासून ते विदर्भाच्या कापूस पट्ट्यापर्यंत जे जे सहकाराच्या आशेवर जगतात, त्या कष्टकऱ्यांचा आवाज आता थेट कायद्याच्या मसुद्यात उमटणार आहे.
कोपरखळी …
सहकार म्हणजे ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’… पण सध्याच्या काळात ‘एकमेका सहाय्य करू, अवघे लुटू श्रीमंत’ असा प्रकार सुरू होता. अशोकराव स्वामींसारख्या अभ्यासू माणसाने आता या कायद्याला अशी धार लावावी की, सहकारातील भ्रष्टाचारी ‘रावणांची’ १० तोंडं एका फटक्यात छाटली जावीत.
महाराष्ट्राच्या या सहकार चळवळीला आता खऱ्या अर्थाने ‘स्वामी’ पावणार का? हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी अशोकराव स्वामींच्या रूपाने एका ‘जाणत्या’ माणसाच्या हाती सुधारांची लेखणी दिली गेली आहे, हे मात्र नक्की!


























