अशोक खरात आणि ‘गजनी’चा अवतार : स्मरणाचा सोयीस्कर विरंगुळा..!


अशोक खरात आणि ‘गजनी’चा अवतार : स्मरणाचा सोयीस्कर विरंगुळा..!

काय म्हणावे या कलियुगाला..? ज्याने अध्यात्माच्या नावाखाली भल्याभल्यांना ‘ब्रह्मज्ञाना’चे डोस पाजले, तो आमचा ‘पुण्यश्लोक’ अशोक खरात आता स्वतःच चक्क ‘अज्ञानी’ बनला आहे! १८ मार्चपासून पोलिसांच्या पाहुणचारात असलेल्या या महाभागाने आता एक नवाच डाव टाकला आहे. पोलिसांच्या प्रश्नांचा मारा सुरू झाला की, खरात थेट ‘गजनी’ अवतारात शिरतो. त्याला काही आठवेनासे झाले आहे म्हणे!

विस्मरणाचा हा कोणता नवा आजार?

अशोक खरात, हा विस्मरणाचा रोग इतका अचानक कसा जडला? ज्याची बुद्धी गुन्हे करताना सवाई गतीने धावत होती, त्याला आता स्वतःचे नाव सांगतानाही कदाचित विचार करावा लागत असेल! आधी पोटदुखी, डोकं दुखणे आणि मळमळणे अशा व्याधींचा आसरा घेतला, काही काळ ऑक्सिजनवरही राहिला; पण प्रकृती स्थिर होऊन जेव्हा एसआयटी (SIT) समोर आली, तेव्हा मात्र याच्या मेंदूची पाटी चक्क कोरी झाली! हा कसला विस्मरण रोग? याला वैद्यकीय भाषेत ‘अ‍ॅम्नेशिया’ म्हणत असतील, पण महाराष्ट्राच्या भाषेत याला निव्वळ ‘सोयीस्कर बनवाबनवी’ म्हणतात.

गुन्ह्यांची जंत्री आणि ढोंगाचा कळस

गंमत पहा, कॅनडा कॉर्नरला बसून अध्यात्माचा बाजार मांडताना, कुणाला गुंगीचे औषध द्यायचे आणि कुणाची आर्थिक फसवणूक कशी करायची याचे उत्तम ‘मॅनेजमेंट’ याच्याकडे होते. लैंगिक शोषणाचे ८ आणि आर्थिक फसवणुकीचे ९ गुन्हे अंगावर असताना, आता “मला काही आठवत नाही” म्हणणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. ज्याने जगाला ‘सर्व विसरून ईश्वराकडे चला’ असे सल्ले दिले, तो आता स्वतःचेच पाप विसरल्याचा बहाणा करत आहे!

“पुरोगामी महाराष्ट्राच्या मातीत असले ‘अध्यात्मिक दलाल’ पुन्हा निर्माण होऊ नयेत, यासाठी आता समाजानेच डोळे उघडण्याची वेळ आली आहे.”

समाजाच्या विवेकाची कसोटी

खरा प्रश्न हा आहे की, या भोंदू बाबा अशोक खरातला मोठे केले कोणी? आपल्याच समाजातील अंधश्रद्धा, विवेकाचा अभाव आणि ‘चमत्कारा’च्या मागे धावणारी मानसिकता अशा लफंग्यांना खतपाणी घालते. जेव्हा सुशिक्षित माणसे आपली बुद्धी गहाण ठेवून अशा ढोंग्यांच्या पाया पडतात, तेव्हाच खरातांसारखी विषवल्ली फोफावते. भक्तीच्या नावाखाली विकृतीचा व्यापार मांडणाऱ्या अशा नरधमांना ठेचून काढणे हाच खरा धर्म आहे. या भूमीत ज्ञानेश्वर-तुकारामांची शुद्ध भक्ती चालते, अशा लफंग्यांची लबाडी नाही!

कायद्याचा सोटा आणि जालीम औषध…

खरात, हा ‘गजनी’ पॅटर्न सिनेमाच्या पडद्यावर ठीक दिसतो, पोलिसांच्या कोठडीत नाही. सरकारी वकील आणि तपास यंत्रणा आता तुझ्या या विस्मरणाला पुरून उरणार आहेत. कायद्याच्या सोट्यासमोर मोठमोठ्यांचे ‘विस्मरण’ पळून जाते आणि जुन्या आठवणी ताजी व्हायला वेळ लागत नाही. तुझ्या या ‘अहं विस्मरामि’ सूत्रावर पोलीस कोठडीचा ‘प्रसाद’ हेच जालीम औषध आहे. एकदा का तो मिळायला लागला, की तुझी स्मरणशक्ती संगणकापेक्षाही वेगाने धावायला लागेल, याची खात्री सार्‍या महाराष्ट्राला आहे!

विस्मरणाचा हा पडदा फार काळ टिकणार नाही, कारण सत्याचा प्रकाश हा या ढोंगी अंधाराला कधीच गिळून टाकायला समर्थ आहे!

संपादकीय टिप्पणी: समाजातील वाढत्या भोंदूगिरीवर प्रहार करणारा हा विशेष लेख असून, अंधश्रद्धेपासून सावध राहण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे.


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!