इचलकरंजीत कायद्याचा ‘खुळखुळा’ आणि आयुक्तांचा ‘डोळा’!


विनापरवाना रस्ता खुदाईचा धिंगाणा ; उमाकांत दाभोळेंचा ‘महापालिका दरबारी’ कडाडून हल्ला..!

इचलकरंजी  : ज्या शहराला ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ म्हणतात, तिथे सध्या मँचेस्टरची नाही तर ‘खड्ड्यांची’ आणि ‘मनमानीची’ कापडं विणली जात आहेत! इचलकरंजीच्या राजमार्गावर सध्या जो नंगानाच सुरू आहे, तो पाहून कुणाही सुज्ञ नागरिकाचे पित्त खवळल्याशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सीईटीपी प्रकल्पापर्यंतच्या रस्त्यावर महापालिकेच्या छाताडावर बसून विनापरवाना खुदाईचा ‘तांडव’ सुरू आहे आणि प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत ढाराढूर डुलक्या घेत आहे!

नेमका काय  प्रकार आहे..?

अहो, इकडे महापालिका लाखो रुपये खर्चून रस्ता सुधारण्याचे ‘पुण्यकर्म’ करत आहे आणि तिकडे ‘सीईटीपी’चे महाभाग कोणत्याही परवानगीशिवाय, कोणालाही न जुमानता तब्बल एक किलोमीटरचा रस्ता उचकटून काढत आहेत. म्हणजे एका हाताने रस्ता बांधायचा आणि दुसऱ्या हाताने तो उरकायचा! हा कसला कारभार? याला ‘प्रशासन’ म्हणायचे की ‘अंधेर नगरी’चा बाजार?

दाभोळेंचा घणाघात..!

भाजपचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी या अनागोंदी कारभारावर शब्दांचे कोरडे ओढले आहेत. त्यांनी थेट आयुक्तांच्या मेलबॉक्समध्ये तक्रारीचा बॉम्ब टाकला आहे. दाभोळे म्हणतात:

“संबंधित विभागप्रमुखांना विचारले तर ते म्हणतात ‘आम्हाला माहितच नाही’. मग ही खुदाई काय आकाशातून पडलेले देवदूत करत आहेत का? ही खुदाई नसून महापालिकेच्या तिजोरीवर आणि जनतेच्या विश्वासावर टाकलेला दरोडा आहे!”

पावसाळा तोंडावर आणि प्रशासन ‘द तोंडावर’!

येत्या काही दिवसांत पावसाळा ‘आ’ वासून उभा राहणार आहे. जर हा रस्ता असाच उघडावाघडा राहिला, तर इचलकरंजीकरांना रस्त्यावरून चालावे लागेल की चिखलात पोहावे लागेल, याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. अपघात झाले, पाय मोडले की मग आयुक्त जागे होणार का?

१. महापालिकेच्या नाकाखाली एक किलोमीटर रस्ता खणला जातो आणि साहेबांना पत्ता नसतो, हे काय प्रशासनाचे ‘दिवाळे’ निघाल्याचे लक्षण नाही का?

२. विनापरवाना काम करणाऱ्या त्या ठेकेदाराचे हात कुणी बळकट केले?

३. दंडाची वसुली होणार की नेहमीप्रमाणे ‘फाईल’ वरखाली करून प्रकरण थंडावणार?

दाभोळे यांनी स्पष्ट ठणकावून सांगितले आहे की— नुसती चौकशी नको, तर त्या ठेकेदाराच्या मुसक्या आवळा! दंडासह संपूर्ण खुदाई चार्जेस वसूल करा आणि तो रस्ता जसा होता तसा करून घ्या. अन्यथा, जनतेचा संयम सुटला तर इचलकरंजीच्या रस्त्यावर या प्रशासनाचा ‘पंचनामा’ झाल्याशिवाय राहणार नाही!

बघूया आता, आयुक्त या ‘खुदाई प्रकरणा’त आपली कार्यक्षमता दाखवतात की ‘विनापरवाना’ शांत राहून या पापाचे वाटेकरी होतात!


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!