इचलकरंजीत ‘स्मृतीजागर’चा रविवारी दिमाखदार समारोप; ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांची प्रमुख उपस्थिती
इचलकरंजी (प्रतिनिधी): इचलकरंजीच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्णक्षण असलेल्या १९७४ च्या ‘सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा वर्षभर सुरू असलेला स्मृतीजागर सोहळा आता सांगता टप्प्यावर आला आहे. या उपक्रमाचा सांगता समारंभ रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती स्मृतीजागर समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कार्यक्रमाची रूपरेषा
प्रमुख पाहुणे : डॉ. राजन गवस (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक)
अध्यक्ष: प्रकाशअण्णा आवाडे (माजी मंत्री व स्वागताध्यक्ष, स्मृतीजागर)
विशेष उपस्थिती : कवी समीरसिंह साळवे (पोलीस उपअधीक्षक, लातूर)
स्थळ: श्री गजानन महाराज (शेगाव) सर्व सेवा संस्था सभागृह, सांगली रोड, खोतवाडी.
साहित्य क्षेत्रातील ऐतिहासिक नोंद
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली १९७४ मध्ये इचलकरंजीत हे ऐतिहासिक संमेलन झाले होते. या स्मृतीला उजाळा देण्यासाठी २६ डिसेंबर २०२४ पासून ‘स्मृतीजागर’ उपक्रम सुरू करण्यात आला. गेल्या वर्षभरात दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग ११ वैविध्यपूर्ण साहित्यिक कार्यक्रम राबवण्यात आले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या १०० वर्षांच्या इतिहासात एखाद्या संमेलनाचा असा वर्षभर स्मृतीजागर साजरा होण्याची ही पहिलीच वेळ असून, याची दखल संपूर्ण मराठी साहित्य वर्तुळात घेतली गेली आहे.
“इचलकरंजीच्या साहित्यप्रेमींनी हा वर्षभराचा जागर अत्यंत उत्साहात यशस्वी केला आहे. या अभूतपूर्व उपक्रमाच्या सांगता सोहळ्याला इचलकरंजी व परिसरातील साहित्य रसिक, वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.” — प्रसाद कुलकर्णी व दिलीप शेंडे (संकल्पक, स्मृतीजागर)
या पत्रकार परिषदेला प्रा. रोहित शिंगे, ॲड. माधुरी काजवे, वैशाली नायकवडी यांसह स्मृतीजागर समितीचे सदस्य उपस्थित होते.




























