
पुण्याच्या रणझुंजार तरुणांनी उपटला १३० किलो कचऱ्याचा ‘मुडदा’
पुणे शहराचे वैभव आणि निसर्गाचे लेणे असलेल्या तळजाई टेकडीच्या अंगावर जो प्लास्टिकचा नरकासूर थयथयाट करत होता, त्याचा आज श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या छाव्यांनी अखेर वध केला! अरण्येश्वरच्या अध्यापक महाविद्यालयातील ८० छात्राध्यापकांनी आणि रोटरी क्लब गांधी भवनच्या शिलेदारांनी मिळून आज जो ‘स्वच्छतेचा रणसंग्राम’ पुकारला, तो पाहून निसर्गदेवताही सुखावली असेल.
प्लास्टिकचा हा अक्राळविक्राळ भस्मासूर !
तळजाईच्या त्या पवित्र कडेकपारीत फिरताना जिथे रानफुलांचा सुगंध यायला हवा, तिथे प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि इतर पर्यावरणाला हानिकारक वस्तूंचा जो काही ‘नाच’ सुरू होता, तो पाहून काळजाला घरे पडतात. पण आज या तरुणांनी कंबर कसली आणि तब्बल १३० किलो कचरा उपटून काढला. हा केवळ कचरा नव्हता, तर मानवाच्या बेजबाबदारपणाचा तो एक मोठा पुरावा होता, ज्याचा आज या मुलांनी निकाल लावला.
नियोजनाचा वज्रमुठ !
या मोहिमेला रोटरीचे डिस्ट्रिक्ट सर्विस प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष परदेशी यांचे बळ लाभले, तर कोर्स २-०८ चे प्रमुख प्रा. योगेश पाटील आणि अश्विनी प्रधान यांनी या सैन्याचे खंबीर नेतृत्व केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. सुनील कालेकर, डॉ. शोभा जाधव यांच्या उपस्थितीने या मोहिमेला एक वेगळीच धार चढली होती.
‘उद्याचे शिक्षक’ मैदानात !
खडू आणि फळा सांभाळणारे हे उद्याचे शिक्षक जेव्हा हातात झाडू आणि पोती घेतात, तेव्हा समजते की हे राष्ट्र घडवायला सज्ज आहेत. मुले म्हणाली, “हा केवळ कचरा उचलण्याचा कार्यक्रम नाही, तर ही आमची जबाबदारी आहे!” किती हे उदात्त विचार!
आता तरी पुण्याच्या सुजाण नागरिकांना जाग येईल का? की पुन्हा उद्या तिथे जाऊन आपल्या पापाचा कचरा टाकतील? लक्षात ठेवा, निसर्ग हा देव आहे आणि त्याची पूजा झाडूनेच होऊ शकते, हे आज या तरुण रक्ताने उभ्या महाराष्ट्राला ओरडून सांगितले आहे!




























