उमाकांत दाभोळे यांच्या प्रयत्नाला मोठे यश
इचलकरंजी: विश्रामबागच्या कट्ट्यावर बसून ‘बघू पुढच्या महिन्यात काय होतंय’ असं म्हणत सुस्कारे सोडणाऱ्या इचलकरंजी पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात अखेर ‘सोनियाचा दिवस’ उजाडला आहे! महापौर उदय धांतुडे (भुजबळ) आणि आयुक्त पल्लवी पाटील या जोडीने प्रशासकीय लालफितीचा फास असा काही सैल केला की, दुसऱ्या टप्प्यात चक्क ३५ हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पदरात सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांच्या देयकांचे दान पडले आहे. अहो, निवृत्तीनंतर आपल्याच हक्काच्या पैशासाठी सरकारदरबारी चपला झिजवणे हा जो काही वनवास असतो, तो या दोघांनी संपवला, याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच!
याला म्हणतात कारभार! एरवी सरकारी कचेऱ्यात ‘फाईल’ हलली की कागद उडतात, पण इथे फाईल हलली आणि थेट निवृत्तांच्या बँक खात्यात खणखणीत नाणी वाजू लागली. आयुक्त पल्लवी पाटील यांनी आपल्या चाबूकवजा शब्दांत विभागांना निर्देश दिले आणि महापौर उदय धांतुडे यांनी ‘एकही कर्मचारी वाऱ्यावर सोडणार नाही’ असा चंगच बांधला होता. त्यामुळेच ग्रॅच्युइटी, रजेचे रोखीकरण आणि भविष्य निर्वाह निधी नावाचे जे ‘मृगजळ’ कर्मचाऱ्यांना दिसत होते, ते आता प्रत्यक्षात उतरले आहे. निवृत्तीनंतर औषधपाण्याला आणि पोराबाळांच्या लग्नाकार्याला पैसे नसले की जो जीव तीळतीळ तुटतो, त्या वेदनेवर प्रशासनाने फुंकर घातली आहे. हा केवळ आकडा नाही, तर ३५ कुटुंबांचा आशीर्वाद आहे!
या यशात केवळ प्रशासनाचेच नव्हे, तर ज्यांनी हा विषय लावून धरला त्या लढवय्यांचेही तितकेच श्रेय आहे. भाजपाचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी सेवानिवृत्तांचे ‘वकील’ बनून जो काही पाठपुरावा केला, त्याला तोड नाही. सोबतच उपायुक्त राहुल मर्ढेकर, लेखा अधिकारी विकास खोळपे आणि विविध कर्मचारी संघटनांनी ‘आकडेमोडीच्या’ जंगलातून मार्ग काढत ही रक्कम मोकळी केली. हौसे-गौसे-नौसे येतात आणि जातात, पण कर्मचाऱ्यांच्या घामाची किंमत राखणारे लोकप्रतिनिधी आणि अधिकारीच खऱ्या अर्थाने लोकांच्या लक्षात राहतात. उदय-पल्लवी या जोडीने हा जो सव्वा कोटींचा धमाका केला आहे, त्याचा पुढचा टप्पाही तितक्याच वेगाने येईल, अशी खात्री इचलकरंजीकरांना वाटू लागली आहे. थोडक्यात काय, तर इचलकरंजी महानगरपालिकेने ‘कामावरून निवृत्त झाले तरी मनातून निवृत्त झालेले नाहीत’ हे सिद्ध करून दाखवले आहे. शाब्बास इचलकरंजी ..




























