बजेटचा बुक्का अन् दारूचा सुक्का : ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या इशाऱ्याने हळद रुसली अन् कुंकू हसलं..!
विशेष संपादकीय | प्रेस मीडिया लाईव्ह

“अहो साहेब, थोडीशी घेतल्यावर काय होतं?” – हा प्रश्न विचारणाऱ्या बहाद्दरांना पाहून आज साक्षात यमराजही कपाळावर हात मारून घेत असतील! तुमची ती ‘थोडीशी’ म्हणजे किती? तर म्हणे ‘दोन क्वार्टर’! शाब्बास! हा कसला अजब न्याय? एखाद्याने चुकून विषाचा पेला ओठाला लावला तर आपण त्याला वाचवायला धावतो, पण इथे आमचे हे ‘बळीराजा’ स्वतःच्याच हाताने स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करायला निघालेत.
आठ दिवसांपूर्वीच ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ने एका रोखठोक लेखाद्वारे महाराष्ट्राला सावध केले होते. आम्ही ओरडून ओरडून सांगितले होते की, “सावधान! तुम्ही दारू पीत नाही, दारूच तुम्हाला पितेय!” आजच्या बजेटमध्ये दारूचे दर वाढले आणि जणू आमच्या त्या शब्दांना धार चढली. या दरवाढीचा परिणाम काय झालाय माहितीये? आज व्यसनी नऱ्याची ‘हळद’ रुसली असेल, पण त्याच्या घरातल्या माऊलीचं ‘कुंकू’ मात्र हसलं आहे.!
सरकारमान्य म्हणजे काय अमृताची कुपी.?
काही जणांचे समर्थन तर मोठे अजब असते! म्हणतात, “काय झालं? ही दारू तर सरकारमान्य आहे!” अरे मूर्खांनो, सरकारने तर विषारी कीटकनाशकांच्या बाटल्यांवरही ‘मान्यता’ दिलेली असते, मग काय ती अमृतासारखी रिचवणार का? परवाना तुम्हाला दारू पिण्याचा मिळाला असेल, पण माणुसकी आणि बुद्धी गहाण टाकण्याचा परवाना कोणीच दिलेला नाही! तुमची ही ‘सरकारमान्य’ नशा तुमच्या संसाराला लागलेली ‘लोकमान्य’ आग आहे, हे कधी समजणार..
॥ प्रेस मीडिया लाईव्ह विशेष : सरकारला सवाल ॥
नशामुक्त भारत अभियान राबवायचा असेल तर केवळ जाहिराती करून भागणार नाही. सरकारने सुद्धा आता काही कठोर आणि ‘सर्जिकल’ निर्णय घेतले पाहिजेत! केवळ दारूचे दर वाढवून तिजोरी भरण्यापेक्षा, नशेचा हा भस्मासुर गाडण्यासाठी सरकारने खालील पावले उचलावीत:
परवाना वाटपावर कडक निर्बंध घाला.
निवासी क्षेत्रातील दारूची दुकाने हद्दपार करा.
केवळ महसुलाकडे न पाहता तरुणांच्या आयुष्याकडे पहा.
जोपर्यंत सरकार नियमांचा दांडा कडक करत नाही, तोपर्यंत कागदावरचे ‘नशामुक्त भारत’ अभियान प्रत्यक्षात उतरणे कठीण आहे!
बजेटचा तडाखा अन् संसाराचा विडा
बजेटमध्ये दारू महागली म्हणून मद्यपींच्या कपाळाला आठ्या पडल्या असतील, पण एका कष्टकरी पत्नीला आज सुटकेचा निश्वास टाकता आला. ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ च्या लेखणीचा हाच तर विजय आहे! देश मोठा होतो तो अशा झिंगलेल्या लोकांमुळे नाही, तर शुद्धीवर असलेल्या पराक्रमी तरुणांमुळे! जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ती बाटली लाथेने उडवत नाही, तोपर्यंत या देशाला नशेच्या विळख्यातून प्रत्यक्ष देवही वाचवू शकणार नाही!
लक्षात ठेवा, परवाना दारूचा मिळालाय, माणुसकी सोडण्याचा नाही! जसा आमच्या लेखाचा परिणाम बजेटवर झाला, तसाच तो तुमच्या मनावरही होऊ दे. ती ‘दोन क्वार्टर’ची नशा सोडा आणि सुखी संसाराच्या नशेला कवटाळा!


























