द्वेषाच्या राजकारणावर पुण्यात ‘जोडो मारो’ प्रहार! प्रेषितांच्या विटंबनेविरुद्ध जनभावना संतप्त; कडक ‘पैगंबर विधेयका’साठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी !

पुणे : ज्या देशाची माती संतांच्या, सुफींच्या आणि सर्वधर्मसमभावाच्या विचाराने भिजली आहे, त्याच देशात आज काही विकृत प्रवृत्ती जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आसुरी आनंद घेत आहेत. शांततेचे दूत आणि मानवतेला बंधुभाव शिकवणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कोलकात्याच्या नाझिया इलाही खान यांनी काढलेले अपशब्द म्हणजे भारतीय संस्कृतीच्या काळजावर केलेले घाव आहेत. या सातत्याने होणाऱ्या वैचारिक विटंबनेच्या आणि द्वेषाच्या राजकारणाच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तमाम संवेदनशील नागरिकांनी एकत्र येत एक भव्य आणि शांततापूर्ण एल्गार पुकारला.

आपल्या देशाची संस्कृती एकमेकांबद्दल आदर बाळगण्याची आहे, पण गेल्या काही काळापासून निव्वळ राजकीय हेतूने श्रद्धास्थानांवर चिखलफेक करण्याची एक नवी फॅशन सुरू झाली आहे. या विकृतीला वेळीच पायबंद घालण्यासाठी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी पुण्यात ‘मूलनिवासी मुस्लिम मंचा’च्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाबाबत आपल्या भावना व्यक्त करताना मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी रोखठोक इशारा दिला की, प्रेषित मोहम्मद पैगंबर हे केवळ मुस्लीम समाजाचे नव्हे, तर संपूर्ण जगाला करुणा आणि शांततेची शिकवण देणारे महामानव आहेत. वैचारिक चिकित्सा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बुरखा पांघरून जर कोणी आमच्या अस्मितेवर आणि श्रद्धास्थानांवर घाला घालत असेल, तर तो संयम आता संपत चालला आहे. आम्ही आमचा जीव देऊ शकतो, पण प्रेषितांचा अपमान कधीही सहन करणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारने या द्वेष पसरवणाऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, म्हणूनच आम्हाला आज रस्त्यावर उतरावे लागले आहे.
या आंदोलनादरम्यान एका अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. सन २०२१ मध्ये आमदार कपिल पाटील यांनी महाराष्ट्र विधिमंडळात मांडलेल्या ‘पैगंबर विधेयका’ची आज देशाला खरोखरच नितांत गरज आहे. कोणत्याही धर्माच्या प्रेषितांचा, पवित्र ग्रंथांचा किंवा दैवतांचा अपमान करणाऱ्यांना कमीत कमी ३ ते ७ वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा झालीच पाहिजे. हा कायदा पूर्णपणे ‘दाखलपात्र आणि अजामीनपात्र’ करावा, जेणेकरून समाजात द्वेषाचे विष कालवणाऱ्यांना कायद्याचा धाक बसेल, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी मा. ज्योती कदम यांच्यामार्फत माननीय राष्ट्रपती, माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन पाठवण्यात आले. नाझिया इलाही खान यांच्यासह समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सर्व घटकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित गजाआड करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान सौ. शाहीन सिंदगी, गुलशन शेख, किरण शेख, आसमा वसीम शेख या महिला कार्यकर्त्यांनी नाझिया खान यांच्या प्रतिमेला ‘जोडो मारो’ करून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
याप्रसंगी नगरसेवक गफूर पठाण, कारी इद्रिस अन्सारी, अजहर तांबोळी (प्रदेशाध्यक्ष एसडीपीआय), युवा नेते अजहर बाबा कादरी, सत्यवान गायकवाड, शाहिद शेख (मोमेंट फॉर पीस अँड जस्टीस), कारी गुलाम यजदानी, कारी मुस्ताक, सलीम पटेल, इलियास शेख पॅंथर, मोईन शेख यांसह अनेक मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपर्क व माहितीसाठी:
अंजुम इनामदार – 9028402814



























