इचलकरंजीच्या नळाला पाणी कमी आणि आश्वासनांची ‘गळती’च जास्त!
“ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ…” असं म्हणायची वेळ आता इचलकरंजीकरांवर आलीय! शहरात ६ जलकुंभ आणि पंपिंग मशिनरी उभा करण्याचं काम सुरू आहे, पण ते कसं? एकदम मुंगीच्या गतीने! याच मुद्द्यावरून भाजपचे उमाकांत दाभोळे यांनी आयुक्तांच्या दारात जाऊन थेट ‘आली अंगावर’ स्टाईलने जाब विचारलाय.
काय आहे हा ‘विच्छा माझी पुरी करा’चा खेळ.?
अहो, ३१ कोटी रुपयांचं हे मोठं पाकीट! ‘गोरुर इन्फ्रा’ नावाच्या कंपनीला कंत्राट दिलंय. करारानुसार १८ महिन्यात काम पूर्ण करायचं होतं. आता ५-६ महिने उलटले, पण कामाचा पत्ता नाही. काही ठिकाणी तर अजून दगड सुद्धा हललेला नाही. दाभोळे म्हणतात, “काय हे… तुमचं आमचं जमलं, आणि जनतेचं पाणी मात्र जिरलं!”
‘बोटं मोडून’ सांगण्यासारखी परिस्थिती :
पी. बा. पाटील मळा, शांतिनगर, जवाहरनगर: इथल्या जलकुंभांची अवस्था म्हणजे ‘पांडू हवालदार’ सारखी झालीय; ड्युटीवर आहे पण काम दिसेना! जुना चंदूर रोड, तोरणानगर, तुळजाभवानीनगर: इथं तर अजून पाया भरणीचा सुद्धा पत्ता नाही.
खळबळजनक ट्विस्ट: ज्या कंपनीला काम दिलंय, तिला म्हणे २०२१ मध्ये ‘ब्लॅकलिस्ट’ करायचा विचार सुरू होता. आता त्याच कंपनीला कोट्यवधींचं काम देऊन प्रशासन काय ‘ह्योच माझा पती’ म्हणून गुणगाण गातंय की काय? असा प्रश्न पडलाय.
आता ‘राया’ला द्यावा लागेल दट्ट्या!
शहरात आधीच पाणीटंचाईचा ‘सोंगाड्या’ नाचतोय. गळती आणि कमी दाबाच्या पाण्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. म्हणूनच दाभोळे यांनी इशारा दिलाय की:तातडीने कामाचा ‘ॲक्शन प्लॅन’ द्या. कामात दिरंगाई झाली तर कंत्राटदाराला घरचा रस्ता दाखवा.१८ महिन्यात काम पूर्ण नाही झालं तर मग ‘मुका घ्या मुका’ नाही, तर थेट कारवाईचा झटका बसेल!




























